मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, २८ नोव्हेंबर, २०१५

व्यावसायिक मनाचा वेध!

व्यावसायिक जीवनात यशस्वी होणाऱ्या किंबहुना वरिष्ठ पदे भूषविणाऱ्या लोकांसाठी स्वतःविषयीची स्वतःच्या मनात असणारी प्रतिमा उंचावर असणे आवश्यक असते. जितकं क्षेत्र अधिक क्लिष्ट तितकी ही गरज जास्त असते. 

आता ह्याविषयी कारण काय असावं ? कोणी उघडपणे ही बाब चर्चित नसलं तरी प्रत्येक थरावर असणाऱ्या व्यावसायिकाची त्याच्या लगेचच असणाऱ्या वरच्या आणि खालच्या अशा दोन्ही थरावरील माणसांची तुलना होत असते. म्हणजे हा आपल्या बॉसची जागा घेऊ शकेल काय किंवा ह्याची जागा ह्याच्याखालचा कर्मचारी घेऊ शकेल काय वगैरे वगैरे. ही तुलना केवळ वर्षाअखेरीस होणाऱ्या मुल्यमापनाच्या वेळीच होत नाही तर दररोज कार्यालयात होणाऱ्या मिटींग्स, ह्या माणसाने दिलेल्या भाषण आणि ई - मेल ह्यामधून प्रकट होणारं त्याचं ज्ञान, लोकांना सांभाळून घेण्याची त्याची / तिची वृत्ती ह्या सगळ्या घटकांची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या नोंद ह्या व्यावसायिकाचे केवळ बॉसच नव्हे तर एकंदरीत सर्व कर्मचारी घेत असतात. कळत नकळत ह्या व्यावसायिकाची एक प्रतिमा निर्माण झालेली असते जी निर्माण करण्यात त्या व्यावसायिकाच्या दैनंदिन वर्तणुकीचा मोठा वाटा असतो. 






कार्यालयातील आपली दररोजची वागणूक, कामगिरी  आपल्या मूल्यमापनात, प्रतिमेत कणाकणाने हातभार लावत असल्याने दररोज आपली सर्वोत्तम कामगिरी द्यावी अशीच खऱ्या व्यावसायिकाची इच्छा असते. ह्यासाठी आपण आपल्या सर्वोत्तम मनःस्थितीत असावे असाच ह्या व्यावसायिकाचा प्रयत्न असतो. त्यामुळे घरगुती पातळीवरील समस्या, दैनंदिन प्रवासाचा होणारा त्रास इत्यादी विपरीत घटक (ज्याला व्यावसायिक जगात Noise म्हणून संबोधण्याची प्रथा आहे) कसोशीने कमी करण्याचा व्यावसायिक सदैव प्रयत्न करतो. हे सर्व घटक वगळल्यावर मग उरतं ते फक्त तुमचं त्या क्षेत्रातील ज्ञान! प्रत्येक क्षेत्रात आवश्यक असणाऱ्या ज्ञानाची व्याप्ती दिवेसंदिवस व्यापक होत चालली आहे. ह्या दिवसागणिक विस्तृत होत जाणाऱ्या ज्ञानाबरोबर सदैव आपल्या ज्ञानाचा आलेख ठेवण्याचा प्रयत्न हा व्यावसायिक करतो. ह्या प्रयत्नात आपण ह्या पोस्टच्या आरंभीस उल्लेखलेली स्वतःच्या मनातील स्वयंविषयीची प्रतिमा महत्वाचा भाग घेते. 

काहीजणांना आपल्या ज्ञानाच्या मर्यादेविषयी जाणीव असते. त्यामुळे मग केवळ ज्ञान ह्या साधनाचा वापर करून यशाच्या शिड्या झरझर सर करणे शक्य होणार नाही ह्याची त्यांना जाणीव असते. त्यामुळे मग ते कार्यालयातील वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याचा, त्यांच्या चांगल्या पुस्तकात राहण्याचा प्रयत्न करतात. ह्या पद्धतीला ज्ञानामार्गे यश संपादन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वर्गात कमी समजण्याची प्रथा आहे. परंतु ह्या गोष्टीकडे काहीशा मुक्त नजरेने बघण्याची गरज आहे. कार्यालयातील अत्युच्च पदावर बसलेल्या व्यक्तींची एक कार्यशैली असते; बहुतेकवेळा ही शैली त्या कंपनीच्या विचारधारणेशी मिळतीजुळती असते. त्यामुळे ह्या विचारसरणीशी, ह्या कार्यशैलीशी साधर्म्य दर्शविणारे व्यावसायिक त्या संघटनेत वेगाने पुढे जाताना दिसतात. ह्या सर्वांना सरसकट वशिल्याचे तट्टू, बॉसचा चमचा अशा विशेषणांनी संबोधिणे योग्य नव्हे. ह्या व्यक्ती ज्ञान ह्या केवळ एका माध्यमावर अवलंबून न राहता दुसऱ्या माध्यमाचा देखील वापर करतात असा काहीसा व्याप्त दृष्टीकोन घेऊन त्यांच्या वागण्याचे विश्लेषण करू शकतो. 


स्वयंप्रतिमा घडविण्यात केवळ तुमच्या व्यावसायिक जीवनातील यशाचाच भाग असतो असे नाही तर तुमचं सामाजिक जीवनातील  स्थानसुद्धा ह्यात काही प्रमाणात भाग घेतं. आजचा व्यावसायिक त्यामुळे सभोवतालच्या घटनांविषयी आपली मते सोशल मीडियामध्ये हिरीरीने मांडताना दिसतो. ही मते मांडताना कधीकधी वादविवाद घडतात, हे वादविवाद सोडविताना त्यांच्याकडे व्यावसायिक जीवनातील वादविवाद सोडविण्याचा सराव म्हणूनसुद्धा पाहता येतं. ह्या सोशल मीडियामध्ये आपली मते मांडताना काही योग्य ठिकाणी आपल्या लिखित संवादकलेचा सुद्धा सराव होऊ शकतो. Political Correctness  हा प्रकार व्यावसायिक जगाच्या बाहेर पाळण्याचा प्रयत्न काहीजण करतात तर काहींना त्याची पर्वा नसते. 

जर तुम्हांला तांत्रिक ज्ञान, दूरदृष्टी, संभाषण चातुर्य आणि अशाच काही तत्सम गुणांच्या बाबतीत समजा दैवी वरदान लाभलं असेल तर तुम्हांला तुमची प्रतिमा सांभाळणे वगैरे प्रकारांवर फारसं लक्ष द्यावं लागत नाही, तुम्ही तुमच्या मर्जीने राहून सुद्धा यशाची शिखरं गाठू शकता. पण अशी लोक थोडकी, बाकी बहुतेकांना आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचे सतत विश्लेषण करत राहून आपल्या प्रगतीचा आलेख गाठायचा असतो. 

आतापर्यंत आपण ज्या व्यावसायिक वर्गाला संबोधलं तो खाऊन, पिऊन सुखी असा वर्ग आहे. ज्यावेळी माणसाच्या प्राथमिक गरजा पूर्ण होतात तेव्हाच तो मग अशा बाकीच्या उद्योगावर लक्ष देऊ शकतो. सोशल मीडियात सहभागी होणाऱ्या सर्वच व्यावसायिकांचा आपल्या व्यवसायात लागणारी कौशल्य परजून पाहणे हा हेतू नसतो. काहीजण फावल्या वेळातील उद्योग म्हणून ह्याकडे बघतात. 

एकंदरीत भारताकडे पाहिलं तर विविध गट आढळून येतात. 
१> वर उल्लेखलेला व्यावसायिक वर्ग, 
२> त्यांच्या आसपास वावरणारा आणि दररोज संसार चालविण्याची मारामार असणारा वर्ग 
३> श्रीमंतीची शिखरं गाठून तिथून वर उल्लेखलेल्या वर्गांकडे पाहणारा अतिश्रीमंत वर्ग. 

प्रसिद्धीमाध्यमातील बहुतांशी लोक हे पहिल्या गटात येऊ शकतात. त्यांना उपजीविका चालविण्यासाठी ज्या बातम्या लागतात त्याचे दोन प्रकार असतात. 
१> सवंग प्रसिद्धीच्या उथळ बातम्या 
२> बहुतांशी वर्गाशी संबधित असणाऱ्या पण ज्याचे बाजारखप मुल्य फारसे आकर्षक नाही अशा बातम्या. 

अतिश्रीमंत वर्ग पहिल्या प्रकारातील बातम्यांचा नियमितपणे रतीब घालत असतो. किंबहुना प्रसिद्धीमाध्यमातील लोकांचा आणि त्यांचा बहुदा करारच असावा की तू मला महिन्याला इतक्या बातम्या पुरवाव्यात. 
आता व्यावसायिक वर्गाला खरतर दोन प्रकारच्या बातम्या उपलब्ध असतात. परंतु सामान्यवर्गातून उगम पावलेल्या बातम्या बऱ्याच वेळा समस्यांशी संबंधित असतात. जसे की पेट्रोलचे भाव वाढले, वाहतूककोंडी वगैरे वगैरे. सरकार ह्या सर्व समस्या सोडवू शकेल ह्यावर बहुतांशी व्यावसायिक वर्गातील लोकांचा विश्वास उडाला आहे. एकतर परदेशगमन करून किंवा भरपूर पैसा कमवूनच ह्या समस्या सुटू शकतात असा बहुतेकांचा समज झाला आहे. त्यामुळे ज्या समस्यांपासून आपण पळू पाहत आहोत त्यासंबंधित बातम्या वाचण्याची त्यांची फारशी इच्छा नसते. मग साहजिकपणे ते अतिश्रीमंत वर्ग ज्यांचा स्त्रोत आहे अशा बातम्यांकडे वळतात कारण हेच आपले भविष्य आहे /असावे असा त्यांचा विश्वास असतो. 
बातम्या येत राहतात, गदारोळ माजत राहतो, आणि समाजातील प्रत्येकजण आपल्या श्रेणीनुसार आपल्या जीवनमार्गावर क्रमण करत राहतो. भाषेतील काहीशी अडगळीला पडलेली नामे, विश्लेषणे अधूनमधून उजेडात आणण्याचे काम मात्र प्रसारमाध्यमे चोख बजावीत असतात. 

शनिवार, २१ नोव्हेंबर, २०१५

अश्रू - वि. स. खांडेकर

Netbhet.com
पुस्तक प्रदर्शनात घेतलेल्या तीन पुस्तकांपैकी वि. स. खांडेकरांची अश्रू ही कादंबरी एक. कथा म्हणून बघितली तर साधीसुधी. एका आदर्शवादी शिक्षकाचा १९५० च्या आसपास तुटपुंज्या पगारात संसार चालविण्यासाठी, आपल्या मुलाचा एक साधा ३० रुपयाची सायकल आणून देण्याचा हट्ट पुरविण्यासाठी आणि आपल्या बहिणीच्या लग्नासाठी २००० रुपये हुंडा जमा करण्यासाठी चाललेला संघर्ष हे वरवर पाहता दिसणारे कथेचे सार! खांडेकर आपल्या मराठी भाषेच्या वैभवाची खैर करताना आढळतात
वानगीदाखल 'रात्र तलम चंदेरी  वस्त्र नेसून विश्वाच्या वीणेवर विश्रांतीची शांत रागिणी आळवू लागली होती . तिच्या एकेक मध्यम  स्वराची एकेक सुंदर तारका होत होती'.काळानुसार मराठी भाषेत कसकसे बदल होत गेले हा संशोधनाचा विषय होऊ शकतो आणि १९५० च्या दशकातील भाषेचं प्रतिनिधित्व करणारं म्हणून ह्या पुस्तकाची निवड होऊ  शकते

कथेतील  महत्वाचे पात्र नायकाच्या पत्नीचे. ती जरी नायकाची पत्नी असली तरी नायिका नाही. ह्या एकत्र कुटुंबात सर्वांच्या जबाबदाऱ्या पार पाडत आयुष्य व्यतित करणे हीच तिची कहाणी आहे, हेच तिचे विश्व आहे. 
कहाणीत खांडेकरांनी उमेच्या मनात शंकरविषयी असलेल्या प्रितीभावनेचे सुरेख वर्णन केलं आहे. कथेतील उमेची प्रिती जशी मूक आहे तशीच खांडेकर ह्या भावनेसाठी वापरलेली भाषा सुद्धा सूचक आहे. 
बाह्य जगाच्या दृष्टीने अगदी सामान्य असलेल्या आपल्या पतीला उमा मात्र अगदी मनापासून पूजत असते. आपल्याच वाट्याला आर्थिक तंगी का यावी असला प्रश्न तिला पडत नाही. समजा हीच परिस्थिती आजच्या युगातील एखाद्या जोडप्याच्या वाट्याला आली असती तर त्या पत्नीला आपल्या पतीविषयी असे निरामय प्रेम जपणे शक्य झाले असते का?
ह्याचं उत्तर नाही असण्याचीच शक्यता जास्त आहे. आणि ह्याचे मुख्य कारण म्हणजे हल्लीच्या युगात स्त्रीचे विश्व उमाइतके मर्यादित राहिलं नाही. ते खूप व्यापक बनलं आहे. ह्या स्त्रीच्या मनात सुरु असणाऱ्या विचारचक्राची वैविधता बरीच व्यापक बनली आहे. जीवनात येणाऱ्या विविधांगी अनुभवामुळे व्यापक बनणारे हे विचारचक्र ह्या आधुनिक स्त्रीला मानसिक समाधानाच्या उंच पातळ्यांवर नेऊन ठेवते आणि अशा प्रकारे मानसिक समाधान अनुभवणारी स्त्री ज्यावेळी आपल्या पतीशी संवाद साधते त्यावेळी जर तिचा वारंवार अपेक्षाभंग होत असेल तर ती हळूहळू स्वतःभोवती एक कोश विणू लागते आणि मग तारा कधी जुळल्याच जात नाहीत. हल्लीच्या युगातील आर्थिकदृष्ट्या गांजलेल्या पुरुषास ही विवंचना बाजूला ठेवून आयुष्यातील बाकीच्या बाबींच्या जोरावर आपल्या पत्नीशी चांगल्या प्रकारे सुसंवाद साधणे कितपत शक्य आहे?

ह्या पुस्तकाच्या आरंभी खांडेकरांनी प्रस्तावनासदृश्य 'दोन शब्द' लिहिले आहेत आणि शेवटी ह्या पुस्तकाची 'पार्श्वभूमी' लिहिली आहेत
'दोन शब्द' मधून खांडेकरांनी आपल्या साहित्यिक कारकिर्दीचा आढावा घेतला आहे. १९३० साली लिहिलेल्या "हृदयाची हाक" ह्या कादंबरीला त्यांना रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. त्यानंतर त्यांच्या लेखन कर्तृत्वाचा आलेख उंचावतच राहिला होता. पण काही कालावधीनंतर ते काहीसे सुप्तावस्थेत गेले. अश्रू ह्या कादंबरीआधीची दहा वर्षे त्यांची कोणतीही कादंबरी प्रकाशित झाली नाही. ह्या सर्वांची मीमांसा त्यांनी ह्या "दोन शब्द" ह्या प्रस्तावनेत केली आहे

"पार्श्वभूमी" मध्ये ते १९०० सालच्या आसपास हरिभाऊ आपटे ह्यांनी वर्णिलेल्या मध्यमवर्गाचा संदर्भ देतात. आणि ती परिस्थिती १९५० सालापेक्षा कशी वेगळी होती ह्याचे पृथ्थकरण करतात. गेल्या शंभर वर्षात मागे वळून पाहिले असता जीवनात खूपच स्थित्यंतरे झाली आहेत असं त्यांना जाणवलं. मला ही एक महत्वाची बाब वाटली. हल्लीची म्हणजे २०१५ सालची मंडळी सुद्धा आमच्या लहानपणी असं होतं तसं होतं असे म्हणत असतात. अगदी नेमकी तीच भावना १९५० च्या सुमारास खांडेकरांच्या मनात सुद्धा होती. म्हणजे फारसे काही चिंतेचे कारण नाही हो मंडळी

खांडेकरांच्या नजरेतून गेल्या काही वर्षात यंत्रयुगाने सामाजिक जीवन व्यापून टाकलं. ह्या यंत्रयुगाने सामान्य माणसांच्या जीवनात ज्याप्रमाणे सुखसोयींच्या संधी उपलब्ध केल्या त्याचप्रमाणे अनेक पटींनी क्लिष्टताही निर्माण केली. खांडेकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर "सुंदर फुलपाखरांच्या रंगीबेरंगी पंखावरून भयंकर साथीचे जंतू जिकडे तिकडे पसरावेत, तसे ह्या युगाचे कर्तुत्व विचारवंतांना वाटू लागलं आहेहे युग ज्याप्रमाणे कॅन्सरसारख्या असाध्य रोगांवर उपाय आणते त्याचप्रमाणे अणुबॉम्बची विध्वंसकतासुद्धा हे युग निर्माण करते. पुन्हा एकदा यंत्रयुगाविषयी खांडेकरांनी जी भावना व्यक्त केली आहे नेमकी तीच आज संगणकयुगाविषयी बाळगून आहोत. यंत्रयुग झालं , आज संगणकयुग बहुदा आणखी काही वर्षांनी यंत्रमानव आणि संगणक ह्यांचं एक संयुक्त युग असेल आणि त्यात माणसे कुठेतरी जीव मुठीत धरून हीच भीती व्यक्त करतील. कालाय तस्मे नमः!! 

गेल्या पन्नास वर्षात दिसलेला अजून एक फरक खांडेकर मांडतात. टिळक आगरकरांनी जो स्वार्थत्यागाचा आणि ध्येयवादाचा कित्ता घालून दिला तो महाराष्ट्रातील पुढल्या दोन पिढ्यांना पुरला. नव्या इंग्रजी शिक्षणाचे फायदे जुन्या विद्येकडून तिकडे वळलेल्या मध्यमवर्गीयांच्या पदरात पडले. त्यामुळे बराच काळ आदर्शवाद बाळगताना सुद्धा आर्थिक विवंचनेचे सावट मध्यमवर्गीयांवर कधी आलेच नाही. पण पहिल्या महायुद्धानंतर मात्र परिस्थिती पालटली. आणि मग त्यानंतर गांधींजीचा उदय झाला. मध्यमवर्गीयांचा ध्येयवाद अजूनही काही प्रमाणात शाबूत राहिला होता. पण इंग्रजी अंमल जसजसा सुस्थिर होऊ लागला तसतसा मध्यमवर्गीयांचा एकजिनसीपणा मोडला. त्यांच्या परंपरागत निष्ठा द्विधा झाल्या. समाजातील एक थर आर्थिक ध्येयांच्यामागे धावताना दिसला

खांडेकरांची विश्लेषणशक्ती अत्यंत खोलवर आहे ह्याची प्रचीती ह्या पार्श्वभूमी लेखनातून वारंवार येत राहते. पैशाची ऊब नसली की माणसाच्या जीवनावर एक प्रकारची प्रेतकळा येते.खालच्या वर्गातील लोकांची पैशाच्या अभावी जी कुतरओढ होते ती शारीरिक गरजांची असते; ह्या उलट पैशाअभावी मध्यमवर्गीयाला मात्र भावनिक आणि वैचारिक कुतरओढीला सामोरे जावे लागते. अगदी खालच्या वर्गाने परंपरेने आणि परिस्थितीने त्याच्या इच्छा, वासना आणि अपेक्षा मर्यादित केलेल्या असतात. त्यामुळे अपेक्षाभंगाचे दुःख मध्यमवर्गाइतके ह्या वर्गाच्या वाट्याला येत नाही
जवळजवळ वीस पाने खांडेकर आपल्याला ह्या अगदी खोलवर विश्लेषणाने खिळवून ठेवतात. अखेरीस ते एक महत्वाचा मुद्दा मांडतात
जगाच्या दृष्टीने अतिशय सामान्य व्यक्तीचे चित्र रंगवणे कितपत महत्वपूर्ण आहे? त्याच वेळी त्यांचे दुसरे मन त्यांना उत्तर देई, "विसाव्या शतकानं दिलेली सर्वश्रेष्ठ देणगी म्हणजे त्याने सर्वसामान्य माणसाला दिलेलं महत्त्व!" असामान्यत्वाचे आकर्षण जगाला वाटावे हे स्वाभाविक आहे. पण जीवनातील अधिक भाग कुणाचा असतो? मुठभर असामान्यांचा की शेकडा नव्व्याण्णव असलेल्या सामान्यांचा? आजवर राजांनी, वीरांनी,संतांनी, तत्वज्ञानी लोकांनी, कवींनी आणि शास्त्रज्ञांनी ह्या सामान्य माणसाला बोलू दिले नव्हते पण आज ह्या सामान्य माणसाची वेळ आली आहे. सामान्य माणूस भलेही काही असामान्य करत नसेल पण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा चुकीचे पाऊल न उचलण्याचा पराकोटीचा संयम हा मध्यमवर्गीय दाखवतो आणि तेच ह्याचे असामान्यत्व!!

खरंतर केवळ कथा वाचून मी ज्यावेळी पुस्तक बाजूला ठेवलं तेव्हा केवळ भाषा वैभवाच्या शाही प्रदर्शनाने मी सुखावून गेलो होतो. कथेचा अचानक झालेला शेवट मला काहीसा रुचला नव्हता. पण दुसऱ्यांदा पुस्तक जेव्हा हाती घेतलं तेव्हा "दोन शब्द" आणि "पार्श्वभूमी" नजरेस पडलं आणि मग ह्या पुस्तकाकडे पाहण्याचा एक दुसरा दृष्टीकोन मिळाला. कथेतील नायकाचं जे व्यक्तिमत्व आहे , त्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंची उलगड खांडेकरांच्या ह्या मनोगतातून मिळाली. पुस्तकं कसं वाचावं हे ह्या खांडेकरांनी समजावून दिलं. घाईघाईने  पाने नजरेआड करणे म्हणजे पुस्तक वाचणे नव्हे हे मला जाणवलं. खांडेकरांसारखा व्यासंगी लेखक असेल तर पुस्तक कसं अगदी मन लावून वाचावं हे मी शिकलो! मराठी भाषेतील ह्या श्रेष्ठ साहित्यिकाचे धन्यवाद! नाताळच्या सुट्टीत ह्या पुस्तकाचे अजून एक वाचन करावे असं म्हणतोय, अजून बरेच पैलू उलगडतील हे नक्की!! 

भटकंतीचा महिना !

२६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी ह्या २९ दिवसांत चांगलीच भटकंती झाली. त्यातील बहुतांशी प्रवास कामानिमित्त आणि एक जवळचा प्रवास शालेय स्नेहसंमेलना...